Thursday 10 May 2018

जत्रा ( एक भयकथा ) भाग ३

      तो एका झोपडीत होता .  झोपडी यासाठीच म्हणायचं कारण ती लाकडाची  होती पण एकदम आलिशान होती . तो एका लाकडी पलंगावर खोलीच्या एका बाजूला होता . त्याला लागूनच एक लाकडी कपाट होतं, त्याच्यावर अतिसुंदर वर्तुळाकार आरसा होता. त्यावरून खोलीतील दिव्याचा प्रकाश परावर्तित होऊन खोलीभर  पसरला होता  .  खोली सुंदर सजवली   होती .
   
            “  आयला रम्या आपल्या काटेवाडीच्या जंगलात असला बंगला हाय ते आपल्याला कसे माहीत नव्हते रे “ गण्या शुद्धीवर येत म्हणाला. आम्हाला तर कुठे माहीत होतं तेवढ्यात समोरचं दार कुरकुरीत उघडू लागलं .  तिघेही प्रतिक्षिप्त क्रिये मुळे भलतेच जास्त सावध होत आक्रमक पवित्र्यात आले.
 “ अरे घाबरू नका मीच आहे “ एक इसम आत येत बोलला. राम्या व मान्या  त्याच्याकडे बघत परिचयाचे हसले . “ तुम्ही आहात होय आम्हाला वाटलं ते पाद्र्याचं भूत आहे ” गणाच्या तोंडावर प्रश्नचिन्ह बघून राम्या म्हणाला त्यांनीच आपल्या सर्वांना वाचवलं आहे नाही तर आपलं राम नाम सत्य झालं असतं ..
       गण्या उठून बसत म्हणाला “ कोण आपण ?  “ क्षणभर विचार करून शांतपणे तो इसम म्हणाला ” मीच तो पाद्री “  तेव्हा तिघांचीही भीतीने गाळण उडाली.  तिघेही भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागले . इतकावेळ मराठमोळा वाटणारा त्याचा वेश हळूहळू पालटू , लागला त्याच्याभोवती त्याला झाकून टाकणारे छोटे-छोटे काळसर ढग जमू लागले.  मग दोन-तीन सेकंद तो पूर्ण अंधारात गडप झाला .

    त्याच्यांंपुढील खुर्चीत बसत तो म्हणाला “ I am the Priest of this Church “    त्याचा पोषाख पुर्ण बदलला होता . पाद्री लोकं घालतात तसा पायघोळ झगा घातला होता . गळ्यात क्रूस  होता आता तो एक इंग्रजी पादरी वाटत होता. त्याचं इंग्रजी तर यांची खात्रीच झाली की हेच त्याचं भूत . पुन्हा एकदा ते मृत्युच्या दाढेत अडकले होते .  अशा गंभीर परिस्थितीतही राम्या त्याला म्हणाला की “ मग तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं काय बोलू शकता ? “ हा प्रश्न ऐकून पादरी जो हसत सुटला तो थांबेचना . “ अरे मी भुत आहे आणि तसंही मला मरण या अगोदरच मराठी येत होतं “
     
      मग गण्या म्हणाला “ आम्हाला मारलं कसं नाही “
 “अरे काय रे  भुतांना माणसाला त्रास देण्याशिवाय दुसरी कामे नसतात असं तुम्हाला वाटतं काय ”
“  नाही तसं नाही तुम्ही लई जणांना मारलं म्हणून म्हटलं “
“ मी फक्त पाटलाला मारलं कारण त्यान मला  शेवंताशी  लग्न करून दिले नाही म्हणून “
“ मग तिथंन पुढं. माणसं मरायला चालू झाली त्यांना कोणी मारले “
 “ जंगलात चालते ती सारी पाटलाच्या भुताटकीची करामत आहे “
“ काय “ ते तिघेही चाटच पडले.
“ आतातर तुम्ही एक नमुना बघितला राम्याला झाडांनी व वेलींनी धरून स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरं मन्या जमीनी  गिळण्याचा प्रयत्न केला आणि गण्याला आगीने आपले भक्ष्य  बनवण्याचा प्रयत्न केला “
 “ मग तुम्ही आम्हाला का वाचवलं ? “
 “ मग काय मरू द्यायचं होतं की काय ? “
 “ पण पाटील तर मेला आहे ना आणि त्याच भूत कुणी बघितलंय “
मी सगळं सुरुवातीपासून सांगतो काय झालं ते त्या पाद्रीने सांगायला सुरुवात केली ……

Sunday 6 May 2018

जत्रा ( एक भयकथा ) , भाग 2

  दिवसाउजेडी माणसाने कितीही फुशारकी मारली की आपण कशाला भीत नाही भूत असो नाहीतर काहीही असो मात्र रात्री अंधार पडल्यावर साऱ्यांचीच बोलती बंद होते . गण्याने कितीही मोठ्या बाता मारल्या असल्या तरी   त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भीती आपले पाय पसरवत होती.
               पाद्र्याची   वाट ही काही वर्दळीची वाट नव्हत गाडीवाट असली तरी चाकाच्या 2 चाकोरीपुरतीच वाट राहिली होती बाकी सगळीकडे रानटी झाडे झुडपे माजली होती त्यामुळे जंगलात आल्यासारखं वाटत होतं . पायाखालचं वाळून गेलेलं गवत पाय पडल्यावर चुरचुर करत होतं . सुरुवातीला या जंगलात फिरताना राजेशाही असणारी त्यांची चाल थोड्याच वेळात दीनदुबळ्या माणसासारखी झाली. काही वेळाने शिकार शिकारीपासून जीव वाचवून पळण्यासाठी जशी धडपड करते त्याहून अधिक धडपड हे तिघे त्या जंगलातुन बाहेर पडण्यासाठी करू लागले . कुठेतरी कोल्हेकुई व्हायची आणि त्यांची काळीजं झटकन उडायची . मग काही काळ शांत जायचा पायाखाली असणाऱ्या गवताच्या चुरचुरी चा आवाज इतका भयानक वाटायचा की कानाचे पडदे  फाटायचे . तरीही धीर करून ते चालले होते त्यांच्या मनात कुठेतरी लपून बसलेला विचार म्हणत होता की भुते वगैरे काही नसतात सारे भास असतात पण……….।
                     तो विचार किती खरा आणि किती खोटा या सार्‍यांपेक्षा सहीसलामत बाहेर जाणे अधिक महत्त्वाची होती इतकावेळ विचारांच्या तंद्रीत चालणाऱ्या भानावर येत मन्या व राम्याला हाका मारल्या त्याचा आवाज त्या निस्तब्ध जंगलात कुठच्या कुठे हरवून गेला. त्याच्या हाकेला उत्तर न आल्याने त्याने मागे वळुन बघीतले तर………….
             तिथे कोणीच नव्हतं . तो एकटाच चालत होता ….  कधीपासून …?केव्हापासून …? त्याला काहीच माहित नव्हत.त्याला काहीच कळत नव्हत . तो घाबरला. गुरासारखा ओरडत मान्या राम्या त्यांच्या नावाने हाका मारत सुटला . थोडाच वेळ पण थोड्या वेळानंतर तो ओरडला खूप ओरडला पण त्यालाही स्वतःचा आवाज ऐकू येईनासा झाला . त्या अघोरी जंगलाने त्याच्यावर ती कोणती करणी केली होती कोणास ठाऊक ….?
          तो वेड्यासारखा धावत सुटला इकडून तिकडे तिकडून इकडे धाप लागेपर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत तो धावतच होता पण तो कुठेच पोहोचत नव्हता फिरून फिरून एकाच जागी येत होता.

           तो घाबरला खूप घाबरला मृत्यू दारावरती दिसल्यावर मृत्यूचा पाश जीवनवृक्षाचा रस संपूवू लागल्यावर सगळेच घाबरतात आणि हाच घाबरट पणा हीच हीच मूर्ती पासून ची भीती सामान्य माणसाकडून अचाट कामे करून घेते मृत्यूपूर्वीच असच बळ त्याच्या अंगी संचारला त्याला राग आला त्या जंगलाचा , त्या पाद्रीचा ,  त्याच्या  प्रेमात पडणार्‍या शेवंताचा , दोघांच्या मिलनाचा अडथळा बनणाऱ्या पाटलाचा  ही.  त्याच रागाच्या भरात त्यानं एक अचाट धाडस केलं .
            जंगलातील वाळलेली लाकडं गोळा केली , पालापाचोळा गोळा केला ,  त्यांचा ढीग लावला  आणि खिशात हात घातला पण आगपेटी नव्हतीच .  तिथेच पडलेले दोन गारगोटीचे दगड घेतले आणि एकमेकांवर  आपटणे सुरू केले .  त्याला कशाचेच भान नव्हत एकाच गोष्टीवर त्याचं लक्ष होतं ती म्हणजे जंगल जाळायचं……। गारगोटीवर गारगोटी आपटता आपटता त्याच्या डाव्या हाताचा अंगठा ठेचून निघाला त्याच्यातून रक्त वाहू लागलं पण त्याला कशाची जाणीव नव्हती गारगोट्या संघर्ष वाढत होतं नि शेवटी त्यातून ठिणगी उडाली ती पाल्यावरती पडली  आणि एकच भडका उडाला …..।
         जाळ लागल्याबरोबर ओली वाळली सगळी लाकडे आगीच्या कचाट्यात येऊ लागली. त्याचबरोबर आजूबाजूचे वृक्ष-वेली सगळेच आगीने आपल्या बाहुपाशात आजूबाजूला घेतले . सगळीकडे नुसती आग झाली .  आगीच्या ज्वाला त्याच्या शरीराला स्पर्श करू लागल्या आगीचा दाह  आता प्रकर्षाने जाणवू लागला ….। हळूहळू तोही यज्ञामध्ये पडलेल्या आहुतीप्रमाणे अग्नी मध्ये  जळू लागला . मृत्युलाही भीती वाटावी इतकी भयानक वेदना त्याला होऊ लागली पण वेळानंतर सारे काही शांत झाले . 
        
           त्याला काहीच कळेना तो कोठे होता तिथे काहीच नव्हते त्याला काहीच दिसत नव्हते त्याला काहीच जाणवत नव्हते फक्त मोकळं आणि हलकं जाणवत होतं हाच असतो का तो मृत्यू ज्याला आपण भित असतो पण यात भिण्यासारखं काहीच नाही…।

         हळू हळू त्याला शीतल पाण्याच्या तुषारांचा गारवा जाणवू लागला आणि गारव्याबरोबरच अनेक आवाज त्याच्या कानात गर्दी करू लागले…..।
मन्या आणि राम्या त्याला  उठवत होते . तो बेशुद्ध झाला होता हळूहळू त्याने डोळे उघडले त्याला जाणवले आपण जिवंत आहोत .

        मग ते जंगल ती आग हे सगळं खोटं होतं का ? तेव्हाच त्याच्या हाताच्या अंगठ्याला असह्य वेदना झाल्या  , हे सारं खरं होतं तर …? मग तो वाचला कसा ? कुणी  वाचवलं ?  पद्र्याच्या भुतानं  यांना काहीच केलं नाही का ….?

      क्रमशः
           
         

Tuesday 1 May 2018

जत्रा एक भयकथा भाग-1 - ऑर्केस्ट्राला ला जायला उशीर झाला

जत्रा एक  भय कथा
नमस्कार मित्रांनो ठरल्याप्रमााणे  मी   भय कथेची मालिका सुरू करत आहे  .........।
भाग -  1 ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला.
               
                काटेवाडी गावाला जत्रेची  परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्रा  होते .  चार दिवस जत्रा चालते गावातील सर्व लोक तेथे जातात . गावातीलच नाही तर आजुबाजुच्या गावाचे तालुक्याचे सारेच लोक येथे येतात त्यामुळे जत्रा गर्दीत होते . जत्रेत वेगवेगळी दुकाने थाटली जातात उंच उंच  पाळणे छोट्या छोट्या रेल्वे गाड्या तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे घटक असतात. वेगवेगळ्या नाश्त्याची ,  ज्यूसची , प्रसादाची , चिरमूऱ्याची ,  धार्मिक पुस्तकांची नि कशाकशाची दुकाने  जत्रेत लागतात . चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा कुस्त्या आणि काय काय …..। मागच्या  पाच सहा वर्षापासून पहिल्या दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान होते ,  दुसऱ्या दिवशी तमाशा होतो,  तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा होतो , नि शेवटच्या दिवशी गाव-जेवन असते . या   जत्रेच्या बहुरंगी कार्यक्रमात लोक आपले सुख दुःख विसरून आनंदाने सामील होतात . जत्रेतील सगळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी असाते मात्र खासकरून तमाशाला नि ऑर्केस्ट्राला जास्तच गर्दी असायची . लोक दोन-दोन तास आधी येऊन बसायचे पुढे बसण्यासाठी लोकांची भांडणे व्हायची .
                       आज ऑर्केस्ट्राचा दिवस होता आणि गण्या मन्या राम्या यशा आणि आबा राम्याच्या घरची मका करायला व्यस्त होते.  मिशन वाल्याने उशीर केल्याने त्यांना  ऑर्केस्ट्राला जायला उशीर  होणार होता .
“ आईला राम्या तुला दुसरा दिवस घावला नाही का मका करायला  “ मन्या वैतागून म्हणाला
“ नाहीतर काय आता कुठली मिळते आपल्याला पुढे जागा ”  आबा मन्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला
“  असुद्या रे घ्या संभाळून आपलाच मित्र आहे तो त्याला मदत करायची नाही तर कोणाला मदत करायची ” गन्या राम्याची बाजू घेत सगळ्यांना म्हणाला . “ झाल आता ही शेवटचं पोतं टाकू या आणि पाच मिनिटात सगळं आवरून पारावर भेटूया “
     काटेवाडी गावची दीड-दोन हजार लोकसंख्या असली तर निम्म्या लोकांहोऊन अधिक लोक वाड्या वस्त्यावरती राहायचे.  हे पाच मित्र ही काटे वस्ती वरती रहायचे .  गावापासून दूर दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारी काटे वस्ती आणि तेथील हे पाच मित्र आज रात्री भलत्याच संकटात अडकणार होते . काटे वस्ती वरून गावात जायला तशी एकच वाट त्याच वाटेने लोकांची ये-जा चालायची मात्र त्या वाटेने चालत जायला अर्धा ते पाऊण तास लागायचा . या वाटेमुळे दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारे गाव तीन ते साडेतीन किमी व्हायचे . तशी दुसरी एक वाट होती पण ती वाट दिवसा वापरायलाही लोक भ्यायचे त्या वाटेचे नाव होते पाद्र्याची वाट . पाद्र्याच्या वाटेबद्दल बऱ्याच अख्यायिका प्रसिद्ध होत्या . या आख्यायिका गावात  फक्त दिवसाच आवडीने  चगळल्या जायच्या मात्र कोणीही पट्टा त्या वाटेने जायला तयार नसायचा .  गावातील प्रत्येकाचे स्पष्ट मत होते की त्या वाटेवर  पाद्र्याचे भूत आहे . कोणी कोणी ते भूत पाहिले होते तर कोणी कोणी त्या भूताला अमावस्येच्या रात्री कंदील घेऊन फिरताना पाहिले होते .  कोणी कोणी तर चक्क भुताचा आवाज हि ऐकला होता तो पादरी इंग्रजी माणूस असल्याने तो इंग्रजीत बोलत असणार हे साऱ्यांनी गृहीत धरून भूत हे इंग्रजी बोलत होते इंग्रजी गाणे म्हणत होते असे गावात पसरवले होते .
  
        ठरल्याप्रमाणे पाचच मिनिटात आवरून गाण्या पारावर पोहोचला .  बघतो तर अजून कोणच आले नव्हते त्यामुळे तो जाम वैतागला तो मन्याला हाक मारायला जाणार तेवढ्यात त्याला मन्या येताना दिसला .
“ आईला मन्या आधीच उशीर झाला आहे आणि हे अजून आले नाहीत आपल्या आपणच जायचं का का बोलवायला जाऊया त्यांना “  गाण्या मन्याला म्हणाला तेवढ्यातच उरलेले तिघे त्याला येताना दिसले त्यांना दोन चार शिव्या देऊन वक्तशीरपणाचे लेक्चर गण्याने उरकून टाकले
अगोदरच उशीर झाला असल्यामुळे  गण्या म्हणाला  की आता आपण पाद्र्याच्या वाटेने गावाकडे जायचे.
राम्या आणि मन्या तयार झाले मात्र यशा आणि आबा घाबरून लांबच्या वाटेने जाऊया असं कळकळीने गन्या राम्या आणि मन्याला सांगू  लागले . गन्याला मागं बसनं अजिबात पसंत नव्हतं म्हणून जवळच्या वाटेने पटकन जाऊया असं त्याचं म्हणणं होतं . त्यावेळी आबाने पद्र्याच्या भुताची आठवण करून दिली त्याच बरोबर कंदील घेऊन फिरणाऱ्या पांडबाची भीतीसुद्धा आबाने गाण्याला दाखवली मात्र गन्या त्यांना घाबरणाऱ्यातला नव्हता . “ भागुबायांनो तुम्ही जावा लांबच्या वाटेने पण आम्ही पाद्र्याच्याच वाटंन जाणार “ असा टोला मारून गन्या राम्या आणि मन्या पाद्र्याच्या वाटेने निघाले .
            
             या पाद्र्याची नि पाटलाच्या पोरी ची चमत्कारिक प्रेम कथा ही गावात फारच प्रसिद्ध होती . साधारणपणे  सांगितलं जायची की ६० - ७०  वर्षापूर्वीच्या काळात हे लफडं (  गाववाल्यांच्या भाषेत  )  झालं .
         पूर्वीच्या काळी ख्रिश्चन लोक धर्मप्रसारासाठी गावोगावी जात असत त्यासाठीच पाद्री गावात आला होता आणि त्याने ख्रिश्चन धर्म प्रसार सुरू केला होता . गावाच्या पाटलाची पोरगी की मुंबईला शिकून आलेली त्यामुळे बऱ्याच पुढारलेल्या विचारांची होती . तिचं नाव शेवंता होतं . शेवंता जर रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायची.  चर्च म्हणजे काही फार प्रशस्त व मोठा नव्हता . तिथल्या तिथे प्रार्थनेसाठी म्हणून छोटासा चर्च पाद्रीने बांधून घेतला होता .  एरवीही वेळ मिळेल तेव्हा ती त्याला भेटायला जायची . चर्चमध्ये प्रार्थनेसाठी फार थोडे लोक जमायचे मात्र काही गोष्टी गावभर पसरावयच्यख असल्या तरी  जास्त लोकांची गरज लागत नाही .  जंगलात     वनवा जसा  पसरत असतो तशा या गोष्टी आगीसारख्या भरभर पसरत जातात  . शेवंताच्या आणि पाद्रीच्या बाबतीत असेच झाले. लोक  शेवंता च्या बाबतीत नाही नाही त्या गोष्टी बोलू लागले .
    “ सर्वांदेखत पाद्री शेवंताच्या हाताचे मुके घेतोय असे मग सगळ्यांच्या डोळ्यामागं काय काय होत असेल देव जाणे “ लोक म्हणायचे .  गावाला चगळायला एक चवदार विषय मिळाला होता . काही झालं तरी शेवंता पाटलाची पोरगी होती ,  मागं कोणीही कितीही  वाईट वंगाळ बोललं तरी पाटलांसमोर बोलायची हिम्मत कुणाची नव्हती . मात्र अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही एक दिवस ही गोष्ट पाटलाला कळालीच . तेव्हापासून म्हणे पाटलाने शेवंताला पाद्रीला भेटायची मनाई केली . पाद्रीलाही चांगलाच चोप दिला . मात्र शेवंताला हे सारं सहन न झाल्यामुळे तिनं चर्चा पुढे जाऊन फास घेतला.
        पोरीन फास घेतल्यामुळे पाटील चांगलाच पिसाळला त्याने  पाद्रीचा चर्चमध्येच खून घडवून आणला सारा गाव जो या लफड्याला नावं ठेवत होता तोच या दोघांसाठी हळहळून रडू लागला . पाटलाच्या नावानं खडे फोडू लागला . त्याला शिव्या घालू लागला . शेवंता आणि पाद्रीच्या प्रेमाला लैला-मजनू , हीर-रांझा, बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमाच्या उपमा देऊ लागला पाटील यांच्या दृष्टीने खलनायक झाला . पाटील  खलनायक झाला खरा मात्र याच खलनायकाचा पाद्र्याच्या भुताने भयानक अंत केला . लोक म्हणू लागले पाटलाला चांगला धडा मिळाला मात्र त्याच बरोबर त्या वाटेवर जायलाही भिऊ लागले
              या साऱ्या गोष्टींमुळे ज्या बाजूला छोटखाना चर्च होता त्या बाजूच्या या वाटेला पाद्र्याची वाट असे नाव पडले .  आणि त्याच वाटेवरून गन्या मन्या आणि राम्या जायला निघाले होते.
क्रमशः ......।