Friday 20 September 2019

प्रलय-२१

प्रलय-२१

      काळोख होता .  घन काळा कातळ काळोख .  स्पर्श रूप रस गंध काहीच नव्हते . फक्त शब्द होते .  तेही मनात . मन तरी होतं का...? काहीच जाणीव नव्हती. कोण होता तो ?  काय होता तो ? फक्त शब्द होते . नि प्रश्न होते . बाकी काहीच नव्हतं . किती वेळ ..? वेळ तरी होती का..?  असेल तर कशाला सापेक्ष धरून मोजणार..?  निर्विकार अवस्था म्हणतात ती हीच का...? हळू हळू जाणीव आली .  त्याला स्पर्श जाणवला .  प्रकाशाला जणू त्याने स्पर्श केला होता .  नंतर दिसू लागला तो दिव्य सोनेरी प्रकाश , आणि येऊ लागला सुमधुर सुगंध . त्याला त्याच्या शरीराची जाणीव झाली .  नंतर सर्व आठवलं . तो आयुष्यमान होता . त्याला आश्चर्य वाटलं . आजूबाजूला फक्त प्रकाश होता .  तो स्पर्शू शकत होता पाहू शकत होता .  काय स्वर्गात आहोत की काय असा विचार त्याच्या मनात आला...
" नाही,  पुन्हा एकदा जन्माच्या मार्गावरती आहेस तू . "  चहुबाजूने आवाज आला . त्याने काही बोलायचे अगोदरच तो आवाज बोलू लागला
" होय तुझा मृत्यू झाला होता . पण तुझी निवड झाली आहे . तूच एक आहेस जो तिचा सामना करू शकतोस ,  तिला थांबवू शकतोस . तू जर फार उशीर केलास तर तुझी मोहिनी त्याच काळोखात असेल जिथे तू होतास .  तेव्हा फार उशीर झाला असेल . तुझ्यासाठी , मोहिनी साठी किंबहुना संपूर्ण जगतासाठी ... उठ जागा हो आणि हा अनर्थ होण्याअगोदरच थांबव....
    त्याच्या कानात आवाज घुमत गेला आणि त्याने हळुवारपणे डोळे उघडले .  तो पुन्हा एकदा त्या म्हातार्‍याच्याच महालात होता . त्याने उठायचा प्रयत्न केला पण त्याच्या छातीत भयंकर वेदना झाल्या.  त्याच्या छातीतुन सोनेरी प्रकाश बाहेर पडत होता . सुरकूच्या शेपटीला जो आकार होता ,  तो त्याच्या छातीत होता .  त्यांने त्याला स्पर्शुन पाहिले . त्याच प्रकाशाची संवेदन होती जी त्याला अगोदर जाणवली होती .
    " थोडक्यात वाचलास किंवा वाचवला गेलायस . तूर्तास तरी ... तो म्हातारा बोलत होता . " प्रलयकारीकिने स्वतः केलेल्या घावातून वाचणारा तू इतिहासात पहिला असशील . ......
    " पण ती मोहिनी होती , अचानक तिच्या डोळ्यातील भाव बदलले...
  "  बहुदा आत्म बलिदानाचा विधी त्यांनी सुरू केला असेल , मग मात्र चिंतेची बाब आहे..."  तो म्हातारा त्याच्या लांब पांढऱ्या दाढीवर बोटे फिरवत कपाळावर आठ्या आणित  तो म्हणाला . आता त्याचा आवाज फारच गंभीर झाला होता ... " जर आपण तिला लवकरच वाचवलं नाही तर , तिच्यावरती किंबहुना संपूर्ण पृथ्वीवरती काळोखाचे साम्राज्य असेल..."
      काळोख शब्द ऐकताच त्याच्या अंगावर शहरे आले .  चेहऱ्यावरती भीती दाटून आली . त्याची अवस्था पाहून तो म्हातारा म्हणाला ... " तू अनुभवलाय काळोख ,  त्याच्या बोलण्यासाठी तो थांबलाच नाही.."  तीच अवस्था असेल प्रत्येकाची , पण तीही सुरुवातीला नंतर जाणवेल , दिसेल ।  पण त्याचं काही चालणार नाही . जनु शरीरावरती दुसऱ्याचा नियंत्रण . त्यातही बर्‍याच पातळी आहेत . हे सर्वकाही  थांबवायचं असेल तर तिला थांबवायलाच हवं . जर तिला तू परत आणू शकत नसशील तर प्रसंगी तिचे बलिदान द्यावे लागेल.  हे इथेच संपलं नाही तर ....."
    तो म्हातारा खरच घाबरला होता . भीती त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती ...
" नाही नाही हे थांबायलाच पाहिजे . ...
   तो बाहेर गेला काहीतरी आवाज येत राहिले . येताना त्याच्या हातात एक काचेची कुपी होती । त्यात सोनेरी कांतीचे कसलंतरी जल होतं .  ते त्याने आयुष्यमानला पाजले. 
त्याच्या संपूर्ण शरीरात वेदनेचा कल्लोळ माजला . रक्त हाडे जनु साऱ्याचा चुराडा होत होता. काही काळानंतर त्याला नव्याने जन्मलेल्या सारखं वाटू लागलं . तो सुरुकूच्या शेपटीचा भाग त्याच्या छातीत सामावला होता .     
     " जा गडबड कर .  सांगितलेले लक्षात ठेव .  वाचवणं शक्य नसेल तर  ...... 
     आयुष्यमान च्या संवेदना तीक्ष्ण झाल्या होत्या .  सुरुकू बरोबर जणू मनातल्या मनात बोलू शकत होता .  सुरुकूच्या आठवणी बरोबर सुरूकू तिथे हजर झाला।   आयुष्यमान त्यावर ती स्वार झाला . त्याच्या मागे ते दोन बुटकेही स्वार झाले...


असाहय्यता अगतिकता या शब्दांचा गर्भित अर्थ त्याला कधी कळालाच नव्हता . आता मात्र त्याला या शब्दांची महती कळली होती . आयुष्मानसमोर प्रलयकारिक उभी होती . होय प्रलयकारिकाच मोहिनी नव्हे  . काळेकुट्ट डोळे त्यात कोणताच भाव नव्हता  . शरीर जरी तिचं असलं तरी दुसरंच  कोणीतरी त्याच्यामध्ये वावरत होतं . जणू मोहिनीच शरीर पांघरून काहीतरी अघोरी या जगात अवतरलं होतं . त्याला उशीर झाला होता . मोहिनीला वाचवण्यासाठी , प्रलयकारीकेला रोखण्यासाठी , त्याच्या प्रेमाची जी छोटीशी जळती ज्योत होती , ती टिकवण्यासाठी उशीर झाला . नि आता अधिक उशीर न होऊ देता , त्या मोहिनीसदृश्य दिसणाऱ्या आकाराला संपवायला हवं होतं . अन्यथा  फार मोठा अनर्थ होणार होता .
                                                             तो त्या म्हाताऱ्याच्या घरातून निघाला नि  तो मोहिनीच्या  शोधार्थ विचारांच्या प्रवाहात बुडून गेला .  एरवी विचारात इतर  मळवटे यायची तसे ती आली नाहीत . विचार स्पष्ट होते . त्याला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या , जाणवत  होत्या ज्या त्याने कधी पहिल्याच नव्हत्या , अनुभवल्याचं नव्हत्या . त्याला आरुषी मोहिनी आणि जंगलातला तो प्रसंग दिसला . रुद्राचा लहान मुलगा मोहिनीच्या हाती मृत्यमुखी जाणं ,तिचं उदास होणं  . नंतर  झालेली त्यांची भेट . तो प्रणयाचा आवेग . त्याला सारे काही आठवले आणि नव्याने जाणवले . ज्यावेळी तिचा खंजीर त्याच्या हृदयाचा वेध घेत होता  , त्यावेळी तिचे डोळे जणू पांढरेशुभ्रच झाले होते . जणू पाटी  पुसून कोरी केली असावी  . त्यावेळी त्याला पार्थव दिसला , ते लहान मूळ दिसलं आत्मबलिदानाचा विधी ,  मारुतांचे जुने मंदिर , त्यांचा मुख्य पुजारी आणि त्याठिकानी उभी असलेली मोहिनी .  त्याचवेळी सुरुकु नि बुटक्यांसोबत तो मारुतांच्या  जुन्या  मंदिराकडे जायला वळला  . तिथे पोहचला खरा पण त्याला उशीर झाला होता . मधोमध असलेल्या आगीच्या डोहात ,  त्या प्रज्वलित ज्वालामुखीत मोहिनी आता उडी मारत होती . त्याने ओरडत तिला थांबवण्याचा  प्रयत्न  केला पण तिच्या  संवेदना जणू बधिर झाल्या होत्या . एखादा मृतदेह पडावा त्याप्रमाणे  तिने आपला देह ज्वालामुखीच्या डोहात फेकून दिला . आयुषमानला राग अनावर झाला . तो त्वेषाने  पार्थव आणि त्याच्या वडिलांवरती धावून गेला . दोघेही निष्णात तालवारबाज पण त्याच्यापुढे त्या दोघांचे काहीच चालले नाही . दोनचार डावपेचात त्यांना हरवत कड्यावरून खाली ढकलून दिले .
                                                                      तोवर इकडे   चित्रविचित्र आवाज येऊ लागले . ते लहान मूल कुठेच दिसत  नव्हते . त्या ज्वालामुखीवरती लाल तुफान आले होते रक्ताचे. हळू हळू ते तुफान जमिनीवरती आकार घेत होते .  पायापासून सुरु होत डोक्यापर्यंत तो मानवी आकार तयार झाला . ते शरीर मोहिनीचंच होतं  पण ती मोहिनी नव्हती ,  ती प्रलयकारिका होती . डोळ्यात  थंडपणा होता .  मोहिनीला वाचवणे आता कधीच शक्य नव्हते . आयुष्यमानला आता प्रलयकारीकेला   मारणे  भाग होते . ती जरी प्रलयकारिक असली तरी आयुष्मान साठी अजूनही ती मोहिनीच होती . मोहिनीचा मृत्यू त्याला कधीच  शक्य  नव्हता . त्याला मोहिनी आठवत होती . तो जागीच स्तब्ध झाला . पण त्याच्याबरोबर आलेले ते बुटके सावध होते . ते दोन बुटके  मोहिनीवरती धावून गेले . तिने  क्षणभरासाठी डोळे  मिटले नि पुन्हा उघडले . त्या काळ्याकुट्ट डोळ्याची कुणालाही भीती वाटली असती पण आयुष्यमान अजूनही तिथे मोहिनीलाच शोधत होता .  प्रलकारिकेवरती  धावत निघालेले बुटके उलटून आयुष्यमान वरतीच धावून आले . तिकडे प्रलयाकरिका पसार झाली नि इकडे आयुष्यमान त्या बुटक्यांसोबत लढत राहिला .


    भीती फार परिणामकारक ठरू शकते , फक्त युक्तीने तिचा वापर व्यवस्थित करता  हवा . एकदा भीती बसली  सांगितलेल्या आज्ञा आपोआप पाळल्या जातात .  त्याच भीतीचा अम्मल आता जंगलातील लोकांवरती होता . आरुषी व मोहिनी दोघीनी थोडे रक्त सांडले  व विरोध करायला असमर्थ आहेत हे दाखवून दिले नि ते गपचूप त्यांच्या आज्ञा पाळू लागले .  पण सर्वच घाबरत नव्हते . सर्व टोळ्यांच्या प्रमुखांना संदेश पाठवले होते . सर्व जंगली जमातीच्या प्रमुखाची निवड उद्या खुल्या मैदानात आव्हानाने केली जाणार होती . भीतीचा अंमल जरी असला  असला तरी परंपरेला  पूर्णपणे बाजूला सुरू शकत नव्हते कारण परंपरेविना असलेल्या पदाचा आदेश हे लोक फार काळ मानणारे नव्हते . आरुषीच्या बाजूने रुद्र लढणार होता .   एकेक प्रमुख  येत होता . प्रतेय्काला परस्तितीची जाणीव होती . इतकी वर्षे रुद्र त्या लोकात राहिला होता तो त्याच्याहून  फार वेगळा नव्हता  . जेव्हा त्याला त्याच्याच लोकांनी तडीपार केलं होत , मरणासन्न अवस्थेत तो जंगलात पडला होता . त्यावेळी याच लोकांनी त्याला  स्वीकारलं होत . त्याला त्यांच्यात मिसळायला वेळ लागला होता पण मीरा सुरवातीपासून त्याच्यासोबत होती कणाकणाने काळ सरत गेला नि तो त्यांच्यातलाच एक झाला . प्रत्येक गोष्टीसाठी त्याला संघर्ष करावा लागला होता पण त्या संघर्षातही मिराचे प्रेम  त्याच्यासोबत होते . त्या दोघांच्या प्रेमाला  सुरवातीला साऱ्यांनी  विरोध केला पण नंतर सारे काही  सुरळीत   झाले . दोघांचाही लाडका मुलगा राजकीय संघर्षासाठी हकनाक बळी गेला होता . इतकी वर्षे रुद्रा जिवंत आहे की मेलाय हेही ढुंकून न पाहणाऱ्या मारूतांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्याच्याशी संपर्क साधला .  त्याच्याशी गोडीगुलाबीने चार शब्द बोलले आणि न जाने कशामुळे रूद्राही त्यांच्या त्या गोड शब्दाला भुलला आणि मदत करण्यासाठी तयार झाला . इतकी वर्षे या लोकांमध्ये राहून , ज्या लोकांनी त्याला घर दिली त्यांच्याशी गद्दारी करायला निघाला होता . त्याला वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या खालच्या थराला जातील . मात्र आता त्याला पश्चाताप होत होता . ज्या मारूतांनी त्याला हाकलून लावलं होतं ,  त त्यांची मदत करत ज्या जंगलातील लोकांनी त्याला स्विकारलं होतं त्यांच्या विरोधात उभा राहणं त्याला पटत नव्हतं . पश्चातापाने तो जळत होता . मीराने त्याच्याशी बोलणं टाळलं होतं त्याचे जे मित्र होते तेही त्याच्याशी बोलेनासे झाले होते . तो एक गद्दार झाला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत त्याच्याबद्दल द्वेष होता . जे घर त्यानं मिळवलं होतं तेही आता हरवलं होतं . आव्हानाचा दिवस उजाडला होता महाराणी असल्याप्रमाणे आरुषी उच्चासनावरती बसली होती .  मध्यभागीलढायची जागा आणि आजूबाजूला त्‍यांचे दंद्व बघण्यासाठी गर्दी जमली होती . रुद्रा उभा होता त्याच्यातर्फे आव्हान देण्यात आलं होतं . एक एक जण येत होता .  त्याच्या सोबत लढत होता .  प्रत्येकाची वेगवेगळी शास्त्रे आणि वेगवेगळ्या पद्धती .  कितीतरी डाव-प्रतिडाव टाकले जात होते । घाम आणि रक्त मातीत पडत होतं . रुद्रा साऱ्यांना वरचढ ठरत होता  . त्याने प्रत्येकाला हरवलं पण एकालाही जीवे मारले नाही त्यांच्यामध्ये पद्धत होती आव्हाना मध्ये एक तरी जिंकायचं किंवा मारायचं . पण रूद्रा प्रत्येक आव्हान जिंकत होता आणि हरलेल्या व्यक्तीला  जीवनदान देत होता .  ज्याचा स्वाभिमान खूप होता असा एखाद-दुसरा स्वतःहून मरत  होता . जेव्हा शेवटचं आव्हान रुद्राने जिंकलं त्यावेळी  तो विजयी म्हणून घोषित झाला . पण जल्लोष कोणीच केला नाही ना कोणी आनंद व्यक्त केला .
    "  तुमच्या नवीन प्रमुखाचा जय जय कार करणार नाही का....?  आरुषी म्हणाली रुद्राच्या काना तप्त लाव्हा यासारखे हे वाक्य गेले .  त्याच्या डोक्यात संतापाची आग पसरली . रागाच्या भरात त्यांनी तिथेच असलेला भाला घेतला आणि आरुषीच्या दिशेने फेकला .  गेल्याने काही क्षणात आरुषीची प्राणज्योत मावळली . मीराचा वडील , ज्याने कधीच त्याला जंगली मानलं नाही त्यांनीच रुद्राच्या नावाचा जयजयकार सुरु केला....
     

No comments:

Post a Comment