Monday 25 March 2019

प्रलय-०४

प्रलय-०४

       ते चार घोडेस्वार होते . त्यांच्या पोषाखावरून ते योद्धा असावेत असे वाटत होते .  काळ्या भिंतीकडे निघाले होते .
" चैत्या तुला वाटत नाही का आपला आयुष्यमान जेव्हापासून त्या मुलीकडून या बिया घेऊन आलाय तेव्हापासून जरा शांत शांतच आहे ..... " भरत हा आयुष्यमानचा मित्र आणि साथीदार होता . चैतन्य , कनिष्क , भरत आणि आयुष्यमान या चौघांनी शपथ घेतली होती .  आणि या चौघांची निवड झाली होती .
" होय रे लगा भरत्या , मला पण तसंच वाटतंय , कन्या तुला काय वाटतंय रे ....?  आयुष्मान आपला शांत शांत झालाय जणू हरवलाय कुणाच्या तरी आठवणीत......
" आयुष्मान आहेत ते , आठवणीत रामतील किंवा ज्यांची आठवण येते त्यांच्याकडे जातील , त्यांना कोण अडवणार...... " कनिष्क ही आयुष्यमान ला चिडवत म्हणाला .
     आयुष्मान शांत होता. तो खरंच तिच्या आठवणीत रमला होता .  तिचं ते रूप , तिचं ते दिसणं , तिचं ते हसणं , तिचं बोलणं ,  तिचं ते चालणं ,  सारं काही त्यानं त्याच्या डोळ्यांमध्ये साठवलं होतं . तो तिला पुन्हा पुन्हा आठवत होता . तो तिला पुन्हा पुन्हा पाहत होता .
" आता कशाला मित्रांची गरज लागते ..? आता आम्हाला विसरणार हो तुम्ही...? " पुन्हा एकदा चैत्या त्याला म्हणाला...
" चला रे गुपचूप , समोर भिंत दिसायला लागलीय , आता आपल्याला सुटे व्हावे लागणार आहे , दोघांना दक्षिणेकडे दोघांना उत्तरेकडे जावे लागणार आहे.....
" ते करु हो आपलं रोजच काम आहे , पण आम्ही काय म्हणतोय.....भरत म्हणाला
" कुणीही काहीही म्हणू नका , कामाच बघा आपल्या , ते महत्त्वाचं..... असं म्हणत आयुष्यमान ने घोड्याला टाच  दिली व तो सगळ्यांच्या पुढे निघाला.....
तिघांनी बरोबर ओळखलं . तेही त्याच्या पाठोपाठ निघाले .  म्हणजे आयुष्यमानला ती खरेच आवडली होती .

   ते चौघेही काळ्या भिंतीपाशी पोहोचले . कितीतरी पिढ्यांपासून ती काळी भिंत त्याठिकाणी तशीच होती .  तिच्याबाबत कितीतरी आख्यायिका सांगितल्या जात होत्या . त्यातल्या किती खरे किती खोटे हेच या भिंतीलाच माहित.... ती भिंत काळ्याकुट्ट पाषाणापासून बांधली होती . 10 ते 12 फूट उंच आणि पाच-सहा फूट रुंद अशी ती भिंत होती .  रक्षक राज्याच्या पश्चिम सीमेवरती ती भिंत बांधलेली होती .  उत्तरेपासून दक्षिणेकडे संपूर्ण भूखंडावर  5000 मैलाहून अधिक लांब असलेली ती भिंत उभी होती .......
" त्याठिकाणी गोल खड्डा दिसतोय का....? " आयुष्यमानने भिंतीस समोर एक दहा फूट अंतरावर असलेल्या छोट्या गोल  खड्ड्याकडे बोट करत सगळ्यांना विचारले....
" असेच  खड्डे प्रत्येक अर्ध्या मैलावरती उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे आहेत..... त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये हा एक एक बी टाकायचा आहे.... पहिल्या खड्ड्यामध्ये काळा बी टाकल्या नंतर दुसरा खड्ड्यांमध्ये पांढरा , त्याच्यापुढे काळा असे बी टाकत जायचे आहेत.....
" मी आणि कन्या दक्षिणेकडे जातो,  तू भरत्याला घेऊन उत्तरेकडे जा..... चैत्या म्हणाला
" चैत्या गडबड करू नकोस ,  इतकी साधी सोपी गोष्ट नाही ही  ,हजारो मैलांचा प्रवास आहे .  बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मानवी वस्ती भेटणार नाही.  खाण्याची पिण्याची सुद्धा व्यवस्था नसेल . त्यामुळे सगळी तयारी करूनच निघूया.....

      ज्या गुप्त भुयारी मार्गाने सरोज अन्वी देवव्रत आणि भिल्लव निघाले होते . तो गुप्त मार्ग शस्त्रागारात निघत होता .
" काय म्हणतोयस हा मार्ग शस्त्रागारात जातो , अरे त्या ठिकाणी तर  चोवीस तास पहारा असतो..... "
" मी त्या पाहऱ्याची व्यवस्था केली आहे सरोज ,"
     त्याने त्याच्या खिशातून वाळूचे काळमापक यंत्र काढले.  त्यातील एका बाजूची वाळू संपूर्णपणे रिकाम्या होण्याच्या बेतात आली होती.  अजून काही काळ गेल्यानंतर एका बाजूची वाळू पूर्ण रिकामी झाली . त्यावेळी एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला....
" हे काय होतं ?  भिल्लवकाका तुम्ही महालामध्ये स्फोट घडवून आणला की काय.....? " अन्वी
" त्याशिवाय सैनिकांचे लक्ष विचलित होणार नाही ,  नाहीतर आपल्याला प्रत्येक सैनिकाला सामोरं जावं लागलं असतं....... भिल्लव
" काही काळ थांबू ,  मग आपण शास्त्रागारातून बाहेर पडू , शस्त्रागारातून पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावर तळघराला जाणारा रस्ता आहे , त्या तळघरातच प्रधानजी असतील......
   सैनिकांच्या पावलांचा आवाज त्यांना जाणवला , हळूहळू कमी झाला . सैनिक निघून गेल्यानंतर,  काहीवेळ थांबून ते शास्त्रागारात आले .  शस्त्रागारात एकही सैनिक नव्हता . भिल्लवाने दोन तलवारी घेतल्या . सरोज ने तिच्यासाठी दोन छोटे खंजीर व  एक तलवार घेतली .  अन्वी नेही एक तलवार घेतली .  देवव्रताने एक तलवार व धनुष्यबान घेतला .        शस्त्रागाराच्या दारातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही बाजूला दोन रस्ते जात होते . उजव्या बाजूचा रस्ता वर महालाकडे तर डाव्या बाजूचा रस्ता तळघराकडे जात होता . डाव्या बाजूच्या रस्त्याच्या शेवटला चार शिपाई तैनात होते .
   " कोण म्हणत होतं मी सैनिकाचा निकाल लावला आहे......? देवव्रत भिल्लवाला चिडवत म्हणाला
    देवव्रताने पुढे होत एकापाठोपाठ एक तीन बाण चालवत तीन शिपायाच्या कंठाचा वेध घेतला ,  तर सरोज ने एक खंजीर फेकून एका सैनिकाला घायल केले . पण तो सैनिक तळघराचे दार उघडुन तळघरात पळत गेला . त्याच्यापाठोपाठ हे चौघेही पळाले पण त्या तळघराच्या दारापर्यंत  पोहोचतायेत त्या अगोदरच  मागुन  महाला कडून येणाऱ्या वाटेने पाच-सहा शिपायांचा घोळका चालत येत होता . त्या घोळक्याने या चौघांना व पडलेल्या तीन शिपायांच्या प्रेतांना पाहिले , तो घोळका त्वेषाने यांच्यावर ती चालून आला . चौघेही पटपट त्या तळघरात गेले . पण मघाशी तळघरात गेलेल्या शिपायाने तळघरातील सैनिकांना एकत्र केले होते .  त्या ठिकाणी पंधरा ते वीस सैनिक व वरून पाच ते सहा सैनिक या चौघांच्या मागावर होते . काही झालं तरी आता या चौघांचं काम अवघड होतं चौघे विरुद्ध पंचवीस असा हा मुकाबला होता......

           जलधि राज्याच्या संशोधन शाळेत सर्व मंत्रीगण जमले होते  . कौशिक त्यांना काही सांगत होता .  तो गुप्तहेर ज्याने काही काळापूर्वी राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडवले होते ,  अजूनही " सिरकोडा इसाड कोते " असं बडबडतच होता . पण आता त्याचा आवाज मंदावला होता . त्याला तेथील पलंगावरती झोपवले होते व त्याचे हात पाय बांधले होते .

 " महाराज काळ्या भिंतीपलीकडील आपल्या मोहिमा कितीतरी वर्षापासून चालू आहेत , पण हा असा अनुभव पहिल्यांदाच आला आहे . काळ्या भिंती पलीकडील महालाच्या परिसरात असलेली दुर्मिळ खनिजे आपण वेळोवेळी आणत असतो ; पण इतक्या वर्षात हा असा अनुभव आपल्याला कधीच आलेला नाही . आपल्याला हे सारं कळालंही नसतं जर योगायोगाने बाटी या फिरत्या जमातीचा कबिला त्या ठिकाणी थांबला नसता... .

      कौशिकने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका इसमाकडे बोट करून सांगितले की
 " हे  बाटी जमातीच्या त्या कबिल्याचे नायक आहेत . त्यांनीच आपल्या हेराला पकडलं व ज्यावेळी आपण दुसरे हेर पाठवले होते त्यावेळी त्यांच्या हाती सुपूर्द केलं . पण त्यांच्यामार्फत आपल्याला बऱ्याच बहुमूल्य गोष्टी कळल्या आहेत महाराज.......

" हे फार विलक्षण आहे कौशिक , इतक्या वर्षात आपल्याला त्या काळ्या भिंतीपलीकडे कोणताही अनुभव आलेला नाही . अचानक हे कसं उद्भवलं असावं ,  यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र असण्याची संभाव्यता नाकारता येत नाही , तुम्हाला कोणत्या गोष्टी कळल्या आहेत...

" सर बाटी ही जमात काळी भिंत बांधण्याच्या अगोदर पासून काळ्या भिंतीपलीकडे राहत आलेली आहे , काळी भिंत बांधल्यानंतरही ज्या काही घटना घडल्या त्या घटना घडत असतानाही , त्या ठिकाणीच राहत होती . असं म्हणतात काळ्या  महालाच्या पहिल्या सम्राटाने बाटी जमातीला अभय दिलं होतं . पण जेव्हा पहीला सम्राटाचा अस्त झाला व काळी भिंत बांधली गेली , त्यानंतरच्या काळात देखीलही बाटी जमात तिथेच राहत आली आहे .  पण आता असे काहीतरी घडत आहे की बाटी जमात स्वतः स्थलांतर करत आहे . त्यांचे बरेच कबिले भिंतीला पार करून रक्षक राज्यात किंवा जलधि राज्यात येताना दिसत आहेत.......

" या सगळ्याचं कारण काय असावं कौशिक.....?
" या सगळ्याचं कारण ,  महाराज एकच आहे ,  ते म्हणजे ' सिरकोडा इसाड कोते '
" म्हणजे नक्की काय म्हणत आहात ....?
" महाराज आपल्या या हेरासारखे अनेक जण त्या काळ्या भिंतीपलीकडे आहेत....
" पण हा तर आपल्या नियंत्रणात वाटतो आहे .....?
" महाराज तो आपल्या नाही या बासरीच्या नियंत्रणात आहे , ज्यावेळी तो तुरुंग तोडून बाहेर पडला त्यावेळी बाटी जमातीच्या लोकांनी बासरी वाजवायला सुरुवात केली होती   ते बासरीचे स्वर कानी पडताच तो एका जागी बसून बडबडत बसला......
" अजूनही तिथे कोपऱ्यात बसलेल्या  बाटी जमातीचे लोक बासरी वाजवत आहेत म्हणून हा आपला हेर शांत आहे अन्यथा....
" अन्यथा काय होऊ शकतं कौशिक.......?
" हे होऊ शकतं " असं म्हणत संशोधन शाळेच्या दारावरती उभ्या असलेल्या एका इसमाने त्या दोन बाटी जमातीच्या लोकांना एका बाणात मारून टाकलं व त्या बाटी जमातीच्या नायकावरती  ही  बाण सोडला.......

     काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी तुकडी काळ्या भिंतीकडे चालू लागली होती त्या तुकडीचा प्रमुख होता अद्वैत . अद्वैत हा रक्षक राज्यात असलेल्या  नामांकित योद्ध्यांपैकी एक योद्धा होता . काळी भिंत बांधल्यानंतर  प्रत्येक राज्यातील योद्ध्यांना काळ्या भिंतीपलीकडे जाऊन  आपली तयारी सिद्ध करण्याची नवीन पद्धत चालू झाली . जो कोणी काळ्या भिंतीपलीकडे जाऊन कोणतीही फार मोठी दुखापत न होता परत येत असे त्याला अभिजीत ही उपाधी बहाल केली जात असे . अद्वैत हाही एक अभिजीत होता . तो बऱ्याच वेळा काळ्या भिंतीपलीकडे जाऊन आला होता . काळ्या भिंतीपलीकडे आलेल्या अनुभवाचे व्रण त्याच्या संपूर्ण शरीरावरती होते . आता तोच अद्वैत काळी भिंत पाडण्यासाठी निघाला होता . काळ्या भिंतीपासून काही मैलांच्या अंतरावरती त्यांची तुकडी विश्रांतीसाठी थांबले होती .
             मध्यभागी पेटवलेल्या शेकोटीभोवती दिवसभर प्रवास करून थकलेले सैनिक , जिव्हाळ्याच्या गप्पागोष्टी करत बसले होते . आजूबाजूच्या परिसरात स्मशानासारखी किर्रररर शांतता होती . रात्र असूनही रातकिड्यांच्या ओरडण्याचा आवाज अजिबात येत नव्हता .

     आणि अचानक चहूबाजूने मोठमोठ्याने
  " सिरकोडा इसाड कोते " असं ओरडल्याचा आवाज येऊ लागला
 

No comments:

Post a Comment