Friday 26 April 2019

प्रलय-१९

प्रलय-१९


    जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती .  त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी  बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला.....

" तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्‍या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन .  ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......
ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी ,  किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची निवड करतो.....
मारुतांचा मुख्य पुजारी आहे , त्याच्याकडे प्रलयकारिकेस जागृत करण्याची शक्ती आहे .  प्रलयकारिका  त्यांची सेवा करत राहिली आहे , पण प्रलयकारिका जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा प्रलय निश्चित असतो .....
  जो कोणी प्रलयकारिकेला जागृत करतो , ती त्यांची सेवा करते मात्र तिचा जन्मच प्रलयकाळ घेऊन होतो... या जगतात पहिल्यांदा जेव्हा प्रलयकारिकेला जागृत केलं गेलं होतं ,  त्यावेळी जो प्रलय आला त्यानंतर प्रलयकारिकेला जागृत करण्याच्या सर्व पद्धतीवरती बंदी घातली गेली होती . पण काही लोकांनी गपचूप तो अभ्यास सुरूच ठेवला . नंतर काही पूजाऱ्यांना मारुतांनी आपला राजआश्रत्र दिला . पण मारूत राजांनी कधीच प्रलयकारिकेला जागृत केलं नाही .  कारण त्यांना प्रलयाची माहिती होती .  मात्र काळ्या भिंतीच्या प्रकरणानंतर प्रलयाबाबत सर्वजण विसरले आहेत .  त्यामुळे त्यांनी कदाचित प्रलयकारी केला जागृत केलं असावं......
    त्या प्रलयकारिके चा सामना करण्यासाठी त्यावेळी काही गोष्टीची गरज होती. तिला हरवण्यासाठी किंवा तिच्या सोबत लढण्यासाठी सामान्य मनुष्य , त्याची सामान्य हत्यारे , सामान्य प्राणी काहीच करू शकत नाही...  त्याच्यासाठी सुरुकुची निर्मिती केली होती . सुरुकू हा एक प्रकारचा प्राणी आहे . पण पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्यापेक्षा तो सर्वस्वी वेगळा आहे . सुरुकु स्वतःहून त्याच्या वाहकास निवडतो आणि त्या सुरूकूने   तुझी निवड केलेली आहे .  तू आता प्रलयकारिकेचा सामना करणार आहेस .........

   " पण प्रलयकारी का कोण आहे ....? मला याबद्दल काही माहीत नाही . मी तिला कसं हरवणार....?  मला माझेच वैयक्तिक भरपूर प्रश्न आहेत ....? ज्यांची उत्तरे मी शोधत आहे.....?

" तुला एक गोष्ट माहित नसेल . ती मी सांगेन ....  प्रलयकारिका म्हणून एका स्त्रीचीच निवड केली जाते .  आणि तिला हरवण्यासाठी सुरूकच  स्वतःहून त्या स्त्रीच्या सर्वात जवळच्या पुरुषांचीच निवड करतो . तो तिचा भाऊ , वडील किंवा पती असतो....

" म्हणजे मोहिनी प्रलयकारिका आहे तर........
     आयुष्यमानला धक्काच बसला होता . कारण ज्या स्त्रीच्या शोधात निघाला होता , ती प्रलय घेऊन येणार होती .  आणि प्रसंग पडला तर तिला मारावे लागणार होतं.... त्याचं हृदय पिळवटून निघाले .  त्यांना आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा प्रेम केलं , तेही त्याच स्त्रीवर जी स्त्री प्रलयकारिका होती .  आणि त्याला स्वतःला आता तिच्या विनाशासाठी जावं लागणार होतं....

" पण मोहिनीच निवड प्रलयकारिका म्हणून का झाली.....?

" प्रलयकारिकेसाठी पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली स्त्रीचीच निवड केली जाते......

    आयुष्यमान पुढे काही बोलणार होता त्याआधीच तो म्हातारा म्हणाला ....

     "  हे बुटके माझे नोकर आहेत जंगलातील हा महाल आणि त्याच्या संरक्षणासाठी त्यांची निवड केली आहे .  त्यामुळे जो कोणी मनुष्य किंवा प्राणी इकडे येताना त्यांना दिसतो त्याबरोबर ते त्याला पकडतात . पण आम्हाला माहीत नव्हतं की तुझी निवड  होणार आहे . त्यामुळे त्यांनी बोट कापलं त्याबद्दल मी क्षमा मागतो......

    त्यावेळी पुन्हा एकदा तो मोठा आवाज आला . समोर असलेल्या खिडकीतून तो प्राणी आत आला  .  तो कक्ष भला मोठा होता त्यामुळे तो प्राणी सहजपणे आत येऊ शकला . घोड्यासारखे चार पाय ,   मोठे च्या मोठे पंख ,  लांब शेपटी व शेवटला वर्तुळाकार आणि एखाद्या पक्षाप्रमाणे लांब मान व चोच .....

" हाच सुरूकू ....
तो म्हातारा म्हणाला

    सुरुकु जवळ येत आपल्या चोचीने आयुष्यमानला डवचत होता . जणू काही आयुष्यमानला तो जन्मापासून ओळखत होता......


       उत्तरेच्या सैनिक दलाचे स्मशान झाले होते . 
        कोणाचा हात गेला होता , कोणाचे पाय जागेला नव्हते . ज्याचं सारं काही व्यवस्थित होतं तो बेशुद्धावस्थेत होता . जेव्हा एक दोघेजण शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी जे बेशुद्ध होते , पहिल्यांदा त्यांना उठवायला सुरुवात केली . नंतर त्या सर्वांनी मिळून जखमींच्या उपचारास सुरुवात केली . ते अंधभक्त एखाद्या महान योद्ध्यासारखे लढले होते  .  ते त्यांच्यासाठी काहीच अवघड नव्हतं . त्यांना सर्व प्रकारची युद्ध कौशल्य आत्मसात होती .  त्यामुळे त्यांच्यापुढे सामान्य सैनिकांचा टिकाव लागणे कधीच शक्य नव्हते .  मात्र ही सारी सामान्य माणसे त्यांच्या महाराणीसाठी , त्यांच्या राजकुमार साठी लढली होती . जखमी झाली होती . आणि हे सर्व निष्फळ ठरलं होतं . कारण राजकुमार त्याठिकाणी नव्हताच .  राजकुमाराला घेऊन जाण्यात भक्त यशस्वी झाले होते......

       जखमींना औषध पुरवले जात होते . जो तो ज्याच्या त्याच्या परीने उपचार करत होता .  पण सारे तंत्रज्ञ मंदाराविषयी विसरूनच गेले होते . तो काहीतरी सांगत होता , त्याच्याविषयी विसरून गेले होते .  तो जिवंत आहे की मृत , तो कुठे आहे याचेही त्यांना भान नव्हतं . मात्र तो तंत्रज्ञ मंदार जिवंत होता .  चाकू जरी त्याच्या हृदयाजवळ लागला असला तरी त्याच्या हृदयात गेला नव्हता.....

    भिल्लवाने मंदारला पाहिले .  सैनिकांच्या मदतीने त्याला उचलून बाजूला घेत त्याच्या वरती उपचार केला .  हृदयाच्या जवळ गेलेला चाकू काढून मलमपट्टी केली .  काही वेळ अजून गेला असता तर मंदार नक्कीच मृत्युमुखी पडला असता . एवढा मोठा तंत्रज्ञ इतके वर्ष जिवंत राहिला पण या साध्या गोष्टीने त्याला मरण येणार होतं....

" अश्वराज , अश्वराजाला पाहिले का ....? तो कोठे गेला.....?
    मंदार अडखळत अडखळत बोलत होता....
" नाही , आम्ही पाहिलं नाही ....... "
भिल्लव म्हणाला....
" माझी पिशवी , शिट्टी  महत्त्वाची आहे .... अश्वराजला माघारी पाठवले पाहिजे .....  आता लगेच आपण नाही जाऊ शकत विक्रमाला थांबवण्यासाठी ....
तर एका सैनिकाने शिट्टी आणून मंदारजवळ दिली .  त्याने शिट्टी वाजवली . अश्वराज धावत आला  .
" अश्वराज परत माघारी जा , शौनकचा शोध घे.... त्याच्यासोबत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखा सोबत काळ्य विहिरीपासून पुढे निघालेल्या विक्रमाच्या सेनेकडे जा ..... शौनक जवळ दृश्य रूपांतरण कापड आहे .  त्याची मदत घेऊन तुम्ही सैनिकांना परावृत्त करू शकता......लवकर निघ......

   तेच दृश्य रूपांतर कापड ज्यामध्ये मंदारने तो प्रलय ,  त्याची काही झलक पाहिली होती .  ते कापड शौनक जवळ होते . अश्वराज वाऱ्याच्या वेगाने तिकडे निघाला.....
 
        महाराणी शकुंतला एका कोपर्‍यात बसली होती .  तिचा पहिला पुत्र तिच्यासमोर जिवंत जाळला गेला . दुसरा पुत्र ' त्याच्यापासून '  झाला होता . त्या पुत्राने आता संपूर्ण पृथ्वीतल विनाशाच्या वाटेवर आणून ठेवला होता . तिसरा मुलगा जो तिचा एकमेव आशेचा किरण होता ,  तोही आता '  त्यानेच '  नेला होता . होय तिला माहित होतं . तो आवाज तिच्या ओळखीचा होता . ती काळी सावली तिच्या ओळखीचे होती.....

    आज जो अंधभक्तांना घेऊन आला होता , तो तोच होता तोच होता , जो काही वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आला होता .  तो होता ज्याने तिच्यावरती भुरळ घातली होती  .  तो तोच होता ज्याच्या संमोहनाखाली येऊन तिने त्याला सर्वस्व अर्पण केले . तो तोच होता ज्याच्यापासून तिला विक्रमाची प्राप्ती झाली.....

    तिने त्याला ओळखले होते ,  पण ती काहीच बोलू शकली नाही . ती काहीच करू शकली नाही.   ती त्याला विरोध करू शकली नाही . तिला स्वतःचा मनस्वी राग येत होता . ज्यावेळी तिचा पहिला पुत्र जिवंत जाळला जात होता त्यावेळी ती गप्प राहिली .  ज्यावेळी तो तिच्या आयुष्यात आला त्यावेळी ती संमोहनाखाली होती .  मात्र आता तसं काहीही नसताना ती त्याला विरोध करू शकली नाही . ती त्याच्याशी लढू शकली नाही . तिचं काळीज पिळवटून निघत होतं .  तिला राग येत होता .  तिला राग येत होता स्वतःचा , तिला राग येत होता राजा सत्यवर्माचा , तिला राग येत होता  साऱ्या अंधभक्ताचा.....

पण ती काही करू शकत नव्हती .  तिला माहित नव्हतं तो कोण होता . तो कुणासाठी काम करत होता . तो कशासाठी हे सर्व करत होता .....? त्यांन रक्षक राज्याचा खरच निर्वंश केला होता......

     महाराज विश्वकर्मा जलधि राज्याची पाच हजारांची सैना घेऊन महाराज विक्रमाला थांबवण्यासाठी आले होते .  महाराज विक्रमाचा तळ आता त्यांच्या दृष्टिपथात होता .
" महाराज इथून पुढं गेलो तर त्यांना दिसू शकेल त्यामुळे आपल्याकडे युद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही......
महाराष्ट्र विश्वकर्मा बरोबर कौशिक चा विश्वासू हेर भार्गव आला होता......
" भार्गवा आपला तळ इथेच टाक . तू माझ्यातर्फे विक्रमासाठी संदेश घेऊन जा आपले सैन्य त्यांची शक्ती त्यांची शस्त्रे साऱ्यांचे वर्णन करा . मी जे पत्र लिहून देतोय ते त्याच्या पुढे जाऊन वाच.......

     जलधि राज्याच्या त्या पाच हजार सैन्य तुकडीचा तळ तिथेच पडला . महाराज विश्वकर्म्याने भार्गवा जवळ पत्र लिहून दिले . तो विक्रमाच्या तळाकडे रवाना झाला......

     दक्षिण-पूर्व समुद्रात असलेल्या बेटांना उडती बेटी म्हणून ओळखलं जायचं .  ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय काळ आला होता . त्यावेळी या बेटावरील लोकांनी सर्व पृथ्वीतलावरील लोकांना प्रलय  थांबवण्यासाठी फार मदत केली होती . उडत्या बेटावरील लोक कधीच पृथ्वीच्या इतर राज्यांशी किंवा राजाशी संपर्कात नसत .  ते नेहमीच अलिप्त राहात आले होते .

जेव्हा राजमहर्षी सोमदत्तने उडत्या बेटांचा उल्लेख केला , त्यावेळी सर्वांमध्ये कुजबुज झाली . कारण उडत्या बेटांची आख्यायिका सर्वांनीच ऐकली होती . राजमहर्षी पुन्हा एकदा बोलू लागले......

" उडत्या बेटांनी त्यावेळी शपथ घेतली होती ज्यावेळी प्रलयसदृश्य स्थिती येईल त्यावेळी ते आपल्या मदतीला येतील..... आपल्याला फक्त तो अग्निस्तंभ पेटवायचा आहे जो आपल्या राज्यात आहे .  त्यानंतर काही प्रहारच्या अवधीतच त्यांची मदत आपल्याला पोहोच होईल.....

    ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली होती त्यावेळी पृथ्वीवरती शेकडो राजे होते . पण ज्या राज यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण लढले होते ते राज्य आपल्या राज्याच्या राजधानीचे ठिकाणच होतं .  त्यामुळेच तो अग्निस्तंभ आपल्या राजधानीच्या जवळच आहे . तो फक्त आपल्याला प्रज्वलीत करायचा आहे....।
त्यावेळेस महाराज म्हणाले...

 " महर्षी आता ही निकडाची वेळ आहे .  अशावेळी आपण अशा आख्यायिकावरती वेळ न घालवता .  खरे प्रयत्न करण्याची गरज आहे . मी काही सैनिकांना तो स्तंभ पेटवण्यासाठी पाठवून देतो . पण आपली खरी समस्या आहे ती म्हणजे हे लोक  त्रिशूळ सैनिकांमध्ये कसे परावर्तित झाले.....?

      राजमहर्षी सोमदत्ताने उडत्या बेटा विषयी माहिती सांगितली खरी ,  पण उडत्या बेटांची निव्वळ आख्यायिका होती , ती खरेच आहेत का .....? असली तर त्यावरील लोक मदत करतील का .....? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते . जर भिंती पलीकडील महालातील शस्त्रागारात असलेला त्रिशूळ आणायचा असेल तर इतरही काही मार्ग असू शकतील असं लोकांचं म्हणणं होतं . एका आख्यायिकेमागे धावत जाण्यापेक्षा काही शूरवीरांना भिंतीपलीकडे पाठवून तो त्रिशूळ आणावा असच बर्‍याच जणांचं म्हणणं होतं........

   या सर्वाच मूळ होतं  ,  ते म्हणजे त्रिशूळ सैन्यात असलेले सामान्य नागरिक . ते सामान्य लोक त्रिशूळाचे सैनिक कसे बनले हाच मोठा प्रश्न होता....

No comments:

Post a Comment