Wednesday 27 March 2019

प्रलय-०६

प्रलय-०६

    " तू इथे काय करतेस ....? आयुष्यमानने तिला विचारलं ......
       आयुष्यमान व भरत तिला त्या ठिकाणी पाहून  आश्चर्यचकीत झाले होते . ती त्याठिकाणी कशासाठी आली असावी याचा विचार करत आयुष्यमान मनोमन आनंदित होत होता . त्याला वाटत होतं कि ती त्याच्यासाठीच तिथे आली असावी .

" मी कसं सांगू हे मला कळत नाही , खरंच.....
तिला काहीतरी सांगायचं होतं , पण ती संकोचत होती . आयुष्यमानच्या मनात लाडू फुटत होते .
" तुम्हाला काही सांगायचं असेल तर निसंकोच बोला , तुम्हाला मदत करायला आम्ही केव्हाही तयार आहोत ......"  आयुष्यमानच्या मनातले वाक्य भरत बोलला , त्यामुळे आयुष्यमान मनात  चरफडला .हळूच त्याने भरत्याला गुद्दा घातला...
" इसाटीकोपा मिसाटीकोपा .....
ती स्त्री म्हणाली
" तुम्हाला हे वाक्य कसं माहित.....? , ते अधिक सावध झाले.......
" मीही एक वारसदारच आहे . माझ्या वडिलांनी माझी निवड केली होती....
" पण गेल्या आठवड्यात झालेल्या वारसदारांच्या सभेला तुम्ही उपस्थित नव्हता..... आणि तसेही आपल्या स्वतःच्या नातलगास वारसदार म्हणून निवड करण्याची बंदी आहे , मुळात वारसदाराला  तोपर्यंत स्वतःचा संसार थाटता येत नाही जोपर्यंत तो पुढचा योग्य वारसदार निवडत नाही  . त्यामुळे तुमची वारसदार म्हणून निवड होणे अशक्यच आहे...... आयुष्यमान म्हणाला .
" म्हणूनच वारसदाराच्या सभेने बाबांच्या निर्णयाला त्यावेळी मान्यता दिली नव्हती . पण नंतर काळ बदलत गेला ,  ज्यावेळी विश्वनाथ वारसदाराच्या सभेचे प्रमुख झाले , त्यावेळी त्यांनी या निर्णयाला मान्यता दिली . माझं काम माझ्या क्षेत्रातपुरतंच मर्यादित होतं , मला कुठे फिरायची मुभा नव्हती . त्यामुळे मला  वारसदारांच्या सभेत जायलाही बंदी होती .
"  विश्वनाथांनी मला याबद्दल कधीच काही सांगितलं नाही , ज्यावेळी माजी सभेचा प्रमुख म्हणून निवड झाली त्यावेळी विश्वनाथांनी याबाबतीत सांगने क्रमप्राप्त होतं...... ते असो पण तुम्ही इथे काय करताय.....?
" बाबांची वारसदार म्हणून निवड होण्यामागचे एक प्रमुख कारण होतं  , ते म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना काही घटनांचं पूर्वज्ञान व्हायचं , स्वप्नातून  किंवा अंतर जाणिवेतून , त्यांना पुढे घडणाऱ्या घटना कधी कधी समजायच्या..... पण बाबा एकदा काळ्या भिंतीपलीकडे गेले होते .  वारसदारांच्या सभेत काहीतरी निर्णय झाला होता .  बाबांना काहीतरी समजलं होतं . त्यासाठी ते काळ्या भिंतीपलीकडे गेले .  तेव्हापासूनच त्यांची मानसिक स्थिती ढासळत गेली..... जेव्हा त्यांना व्यवस्थित समजत होतं , त्या वेळीच त्यांनी पुढचा वारसदार म्हणून माझी निवड केली होती.....
" ते असू द्या हो पण तुम्ही इथे काय करताय हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं..... भरत म्हणाला.....
" जरी त्यांची मानसिक स्थिती ढासळली असली तरी अजूनही त्यांना काही घटनांचे पूर्वज्ञान होतं . तुम्ही त्या बिया घेऊन गेल्यानंतर बाबासारखे पळत होते ....' काळी भिंत , बिया , आयुष्यमान धोका......'  मला वाटतं ते म्हणत होते की आयुष्यमानला काळ्या भिंतीपासून व बियांपासून धोका आहे.....
" पण हे कसं शक्य आहे ....?मधूनच भरत म्हणाला.....
" मी बरेच धोके पचवलेले आहेत , तुम्ही माझी काळजी करू नका ,  तुम्ही परतून घरी जा त्या ठिकाणी तुमचे बाबा एकटे असतील..... आयुष्यमान असं म्हणत असतानाच त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या .  कारण तिला आयुष्यमानची काळजी वाटत होती  आणि तिला त्याची काळजी वाटत असल्याने त्याला मनोमन आनंद झाला होता....
" मी बाबांना शेजारच्या गावात असलेल्या धर्मशाळेत बाबांना सोडून आलेली आहे , मी तुमच्याबरोबर उत्तरेकडे येणार आहे.....
" आयुष्यमान ती तुझी काळजी घेण्यासाठी उत्तरेकडे येणार आहे .....भरत आयुष्यमान च्या कानात कुजबुजला व नंतर तिच्याकडे वळून म्हणाला " अहो तुम्ही आमची काळजी घेण्यापेक्षा आम्हाला तुमची जास्त काळजी घ्यावी लागेल.....! "
 आयुष्यमानला मनोमन वाटत होते कि तिला बरोबर घेऊन जावे . पण तो तसं करू शकत नव्हता , कारण झालेल्या निर्णयानुसार त्या दोघांनाच उत्तरेकडे जाणे भाग होते . भरतचं म्हणही बरोबर होतं तिचीच अधिक काळजी घ्यायला लागणार होती ,  आणि ती बरोबर असल्यामुळे त्यांचा वेगही मंदावणार होता .
" तुम्ही आमच्यासाठी तुमच्या बाबांना  धर्मशाळेत सोडून येऊ नका .  आम्ही आमचं कार्य करू शकतो , आणि काळजीही घेऊ शकतो.....
" माझा निर्णय झालेला आहे आणि तुझा ही झालेला आहे . आयुष्यमान  तुला वाटत नाही का मी तुझ्याबरोबर यावं.....
" इथं मला काय वाटतं याचा प्रश्न नाही निर्णय काय झालाय याचा प्रश्न आहे....? सभेने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जाणं हे योग्य नाही.....
" बरं मग मला सांगा ,  उत्तरेकडच्या जंगलात भरपूर जंगली प्राणी आहेत  . जर एकाच वेळी तुमच्यावरती चार-पाच वाघांनी धावा बोलला तर काय कराल.....
" आम्ही काहीतरी करू शकतो , पण जर तू आमच्या बरोबर असली तर आम्ही काहीच करू शकणार नाही .  कारण तुझ्या सुरक्षेसाठी आम्हाला वेगळी कसरत करावी लागेल.....
" फार लांब कशाला आत्ताच पाहूया ,  समजा मी इथे नाही आहे आणि या वाघांनी तुमच्यावरती धावा बोललेला आहे ........" जेव्हा तिनं हे वाक्य संपलं तेव्हा त्यांच्या मागून वाघाची डरकाळी ऐकू आली.....

   आयुष्यमान मागं वळून पाहिलं त्या ठिकाणी तीन वाघ आक्रमकतेचा पवित्रा घेऊन कोणत्याही क्षणी उडी मारायच्या बेतात उभे होते . ते वाघ साधेसुधे नव्हते . त्या जंगलातील वाघाचा आकार साधारणपणे असलेल्या वाघाच्या आकारापेक्षा दुप्पट होता . असे ते विचित्र आणि  पूर्ण वाढ झालेले मोठे व एका माणसाला सहजपणे त्यांच्या नाश्त्याला पचवणारे वाघ होते  . त्यांची तलवार त्यांच्याजवळ नव्हती . त्यांचे घोडे त्यांच्यापासून काही पावलांच्या अंतरावर होते .  पण त्यांनी हालचाल केली असती तर वाघाने त्यांच्यावरती धाव घेतली असती .  आयुष्यमान तसाच थांबला  . वाघ ही तसेच स्थिर होते . हळूहळू करत तो घोड्याकडे जात होता . भरत ही हळूहळू घोडा कडे सरकत होता .  दोघेही घोड्यापाशी पोहोचले . त्यांनी त्यांच्या तलवारी हातात घेतल्या .  त्याच वेळी एका वाघाने भरत वरती तर दुसऱ्या वाघाने आयुष्यमान वरती उडी घेतली . भरतने बाजूला सरत तलवार  अशी धरली जेणेकरून वाघाने उडी घेतली तरी ती तलवार सरळ वाघाच्या काळजात आरपार जाणार होती .  पण वाघाने खूपच उंच उडी घेत मागच्या पायाने भरतला तोंडावरती पाडले . आयुष्यमानच्या खांद्यावरती पंजा मारत त्या वाघाने आयुष्यमानलाही खाली पाडले . आयुष्यमाने त्याच्या हातातली तलवार पडू दिली नाही .  दुसऱ्या वेळी तो वाघ त्याच्यावरती उडी घेत पंजे मारायला येत असतानाच आयुष्यमाने तलवार चालवत त्याच्या पुढच्या एका पायाचा पंजा कापून टाकला.....       
त्यामुळे वाघ अधिकच चवताळला , त्याने लंगडत लंगडत येत  आयुष्यमानच्या पायाला धरले व त्याला भिरकाउन दिले .  आयुष्यमान जोरात जाऊन झाडाला आपटला .  उभा असलेला तिसरा वाघ चवताळून जाउन आयुष्यमानवरती उडी घेतली . त्याच्या गळ्याचा घोट जाणारच होता , पण तीनही वाघ एकाच वेळी स्तब्ध झाले , पुतळ्या प्रमाणे.....
 
        तिन्ही वाघ एखादा पुतळा  असावा तसेच  होते  . ते सजीव आहेत  हे अजिबात जाणवत नव्हते .  त्या दोघांनाही नक्कीच भास होत असावा ,
" बघितली मी तुमची शक्ती साधे वाघ तुमच्यावरती धावून आले तर तुमचा जीव जाणार होता , आणि उत्तरेच्या जंगलात वाघापेक्षा बरेच चित्रविचित्र प्राणी सुद्धा आहेत हे माहित नाही वाटतं तुम्हाला......?
" काय ....? काय केलस तू हे......  हे वाघ असे का स्तब्ध झाले आहेत......?
" म्हणूनच मी म्हणते मला तुमच्या बरोबर येऊ द्या तुम्हाला माझी गरज आहे.....
    ते दोघेही वाघापासून दूर झाले . त्यावेळी घोड्यावर बसून तिने डोळे झाकून काही क्षण थांबली. ते वाघ गपचूप जंगलात निघून गेले ....
" तुम्ही हे नक्की कसं केलं  ..... ?आश्चर्यचकित झाला होता .
" अरे भरत्या ती सर्व प्राण्यांच्या मनावर नियंत्रण करू शकते.....! आयुष्यमान म्हणाला.....
" तरीही तू आमच्या सोबत येणार नाही , कारण सभेच्या विरुद्ध कोणताही निर्णय आचरणात आणला जाऊ शकत नाही . तू आताच्या आता माघारी जा.....
    आयुष्यमानला जरी मनातून वाटत असले तिने त्याच्याबरोबर यावं,  पण सभेच्या निर्णयाविरुद्ध जाणे त्याच्या मनाला पटणारे नव्हते . तो कर्तव्यनिष्ठ होता.....

    ते दोघेही घोड्यावरती बसले  व उत्तरेकडे निघाले .  त्याने तिच्याकडे वळूनही पाहिले नाही  . आयुष्यमानला मनोमन खूप वाईट वाटत होतं . त्याने मनातल्या मनात तिची क्षमायाचना केली . जाता जाता शेवटचा पहावं म्हणून त्यांनी मागं वळून पाहिलं पण ती तिथे नव्हतीच .
तिचा घोडा दक्षिणेकडे चाललेला दिसत होता . त्याने मनातल्या  स्वतःला दोष देत घोड्याला टाच  दिली व तो पुढच्या खड्ड्याकडे निघाला .

       प्रधानजी , अन्वी , देवव्रत प्रधानजीसाठी लढलेले आठ सैनिक , भिल्लव नि सरोज प्रधानजींच्या मागोमग त्या भुयारातून नगराबाहेर पोहोचले . नगराच्या तटबंदी बाहेर दोन कोसावर असलेल्या जलधि राज्याच्या पहारा  कक्षाकडे जायचा त्यांचा बेत होता . काही काळ विश्रांतीसाठी ते त्या ठिकाणी थांबले होते . रात्रीचा अंधार पडला होता . दुसऱ्या दिवशी सकाळी  प्रधानजीला फाशी देण्यात येणार होती . चौथ्या प्रहराला बदली सैनिक त्याठिकाणी येणार होते .  त्यावेळी  तळघरातील तुरुंगात पडलेली प्रेते पाहून प्रधानजींचा कसून शोध घेतला जाणार होता . त्यामुळे लवकरात लवकर पुढे जाणे गरजेचे होते . पण सरोज नगराकडे निघून गेली होती .  तिच्या सखी त्या वेश्यालयात होत्या   त्यांना एकटे सोडून ती जाऊ शकत नव्हती . भिल्लवाला तिला सोडून पुढे जाणे जिवावर आले होते . तो उदास होऊन एका बाजूला बसला होता .
" भिल्लवा तुला आमच्याबरोबर येण्याची गरज नाही ,  तू   या आठ सैनिकांना घेऊन उत्तरेच्या जंगलात जा .... उत्तरेच्या जंगलात असलेले सैन्य गोळा कर  . पुढचे आदेश मी तुला पाठवेनच ......
      सार्थक व त्याच्या  साथीदार सैनिकांबरोबर  तो  नगराच्या बाजूने उत्तरेकडे च्या जंगलात निघाला .
इकडे अन्वी , देवव्रत व प्रधानजी जलधि राज्याच्या पहारा कक्षाकडे निघाले.....

No comments:

Post a Comment